गणेश विशेष
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com

गणेशोत्सवाचं शतक. भावभक्तीचं शतक. पिढय़ान् पिढय़ांच्या एकजुटीचं शतक. स्नेह आणि ऋणानुबंधांचं शतक. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणाच्या उत्सवी परंपरेचं शतक. खरं तर अशी अनेक विशेषणं लावून आजच्या भाषेत सांगायचं, तर ‘टॅग करून’ एका उत्सवाचं वर्णन करता येईल. हा आहे इंद्रवदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा शतकमहोत्सवी गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देशच मुळी स्वातंत्र्यासाठी जनजागृती व िहदूंचं संघटन करणं हा होता. या पाश्र्वभूमीवर दादर येथील तत्कालीन तुळशीदास तेजपाळ चाळीने १९१८ मध्ये गणेशोत्सव सुरू केला आणि पुढे या चाळीचे रूपांतर इंद्रवदन सोसायटीत झाल्यावरही ही प्रथा कायम राहून यंदा येथील गणेशोत्सावाचं शतकमहोत्सवी वर्ष साजरं होत आहे.

गतकाळातील आठवणींच्या नोंदींनुसार मारुती मास्तर नावाचे गृहस्थ तत्कालीन चाळीत राहात, त्यांनी हा उत्सव सुरू केला. त्या सुमारास कोहिनूर मिलच्या बाजूस असणाऱ्या एका बंगल्याच्या हॉलमध्ये गणेशोत्सव साजरा होत असे. पुढे चाळीत मांडव घालून उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, जी आजतागायत कायम आहे. आजच्यासारखा कार्यक्रमांचा झगमगाट किंवा नेमक्या शब्दांत सांगायचं तर इव्हेंटीकरण तेव्हा झालं नव्हतं. श्रद्धा आणि संघटनकुशलता यांना वरचं स्थान होतं. सुरुवातीला हा उत्सव पाच किंवा सात दिवस साजरा होत असे. तेव्हा मांडवही घातला जात नसे. नंतर मांडव घालून, गोणपाटावर बसून कार्यक्रम पाहिले जात. ताडपत्र्यांचा मांडव मशीदहून भाडय़ानं आणला जात असे आणि सर्व जण मिळून तो घालत असत. कालांतरानं मांडवावर प्लास्टिकचं आच्छादन आणि खुच्र्या असा बदल झाला. या आनंदोत्सवाला एखाद्या वेळेस दंगलीचे गालबोटही लागत असे. पूर्वी रॉकेलच्या दिव्यांचा काळ होता, पण उत्सवाच्या वेळी किट्सन लाइटच्या प्रकाशात कार्यक्रम होत असत. चाळकरी रहिवाशांची सांपत्तिक स्थिती जेमतेम असल्यानं वर्गणी फारशी जमत नसे. वर्गणीची सक्ती नव्हती, ती ऐच्छिक असे. त्यामुळे साधारणपणे १०५ ते १२० रुपयांच्या दरम्यान वर्गणी जमायची. आरती, प्रसाद, रोजची पूजाअर्चा, नवेद्य या गोष्टी वर्गणी कितीही कमी जमली तरी नेमानं होत असत. मांडवाला जास्तीत जास्त पन्नासेक रुपये खर्च येई आणि काही कार्यक्रम व खेळांच्या स्पर्धा होत असत. स्टेज टेबलांचं नव्हे तर लाकडी ओंडक्यांचं तयार केलं जाई. नावीन्यपूर्ण कल्पनांनी साकारणारं मखर कायमच रहिवासी कलाकार आणि कार्यकत्रे मिळून तयार करतात.

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम

कार्यक्रमांची रेलचेल

त्या काळी व्याख्यानं, मेळे, नकला आदी कार्यक्रम होत असत. निवडक ऐतिहासिक आणि सामाजिक नाटकांचे प्रयोग, कीर्तने, प्रवचने, पोवाडे यांसारखे कार्यक्रम हे तत्कालीन उत्सवातील प्रमुख आकर्षण होते. विष्णुबुवा निजामपूरकर, तांबेशास्त्री, नाना बडोदेकर, पं. वैजनाथशास्त्री आठवले, बाबामहाराज सातारकर आदी नामांकित विद्वानांची पुराणं व कीर्तनं होत. शाहीर मुळे आणि शाहीर खाडिलकर यांचे पोवाडे सादर होत. अच्युत बळवंत कोल्हटकर, वामन मल्हार जोशी, विश्वनाथ गोपाळ शेटय़े यांची व्याख्यानं या उत्सवात झाली होती. एक लक्षणीय कार्यक्रम असे चक्रीव्याख्यानाचा. त्यात तीन-चार वक्ते एखाद्या राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक विषयांवर परस्परविरोधी मतं मांडत आणि शेवटी अध्यक्ष विषयाचा समारोप करत. त्यामुळे चांगलंच विचारमंथन होत असे. शिवाय काव्यगायन आणि त्यापुढचा टप्पा म्हणजे मराठी-िहदी गाण्यांचा वाद्यवृंद सादर होत असे. गणेशोत्सवाखेरीज सहनिवासात दत्त जयंती, गीता जयंती, गोकुळाष्टमी, दसरा, होळी आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला जाई. दत्त जयंतीच्या उत्सवात एकदा बालगंधर्वदेखील उपस्थित होते. तर एका वर्षी श्रीधरस्वामींचे स्वागत व पाद्यपूजा करण्यात आली होती. यापकी काही दिनविशेष अद्यापही साजरे होत असून त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचा आनंदोत्सव, गरबा, भोंडला आदी दिनविशेषांची भर पडली आहे. गणेशोत्सवाच्या प्रमुख टप्प्यांच्या वेळी गणेशयाग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी उत्सवकाळात सहस्रावर्तन होत असते.

स्थानिक कार्यक्रम, स्पर्धा

सहनिवासातील कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी आणि लहान मुलांना सभाधीटपणा येण्यासाठी स्थानिक कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा यांसाठी उत्सवकाळातला एक दिवस आवर्जून ठेवला जातो. त्यामुळे लहानपणापासूनच नाच, गाणी, नाटुकले, वेशभूषा स्पर्धा आदींमध्ये भाग घेतला जायचा आणि या गणेशोत्सवातील कार्यक्रमांच्या निमित्ताने या एक प्रकारच्या कला कार्यशाळेमधून नवीन कलाकांराची घडण व्हायची आणि अजूनही होत आहे. काही वेळा स्थानिकांनी छोटय़ा-छोटय़ा एकांकिका लिहिल्या आणि त्या सादरही केल्या. स्थानिक कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा या दोन्ही कार्यक्रमांत बदलत्या काळाचे टप्पे दिसतात. सामाजिक-धार्मिक, दूरचित्रवाणीवरील मालिका, चित्रपटांतील पात्रे व गाण्यांवरची नृत्ये, जाहिरात क्षेत्र आणि आताशा वाढू लागलेला समाजमाध्यमांचा प्रभावही या कार्यक्रमांत दिसतो. सहनिवासातील सुगरणींच्या हातच्या चवीला प्रोत्साहन आणि दाद देण्यासाठी सुरू झालेल्या अन्नकोट स्पध्रेत कालमानानुसार बदल होऊन आता पुरुषही सहभागी होऊ लागले आहेत.

नाटय़रंग आणि सांस्कृतिक रंग

मराठी माणसाची नाटकांची आवड लक्षात घेऊन गणेशोत्सवात वैविध्यपूर्ण अशा आशय आणि विषयांवरची नाटकं सादर झाली. त्यापकी हीरकमहोत्सवातील ‘लेकुरे उदंड झाली’ आणि अमृतमहोत्सवातील ‘पाहुणा’ ही व्यावसायिक नाटकं अनेकांच्या स्मरणात राहिली. पण केवळ व्यावसायिक नाटकांचे कार्यक्रम न करता व्यावसायिक नाटकांच्या तोडीस तोड नसली तरी त्या जवळ जाणारी नाटकं सहनिवासातील रहिवाशांनी स्वत:च बसवून सादर केलेली दिसतात. पूर्वी आणि आताही या नाटकांना होणाऱ्या गर्दीमुळं इथली नाटय़परंपरा, प्रसिद्धी आणि प्रेक्षणीयता दिसून येते. या हौशी नाटय़मंडळींत सहनिवासातील रहिवासी असणारे व्यावसायिक नाटकांतले कलाकारही तितक्याच समरसतेनं काम करत. तर ‘दिवा जळू दे सारी रात’ हे नाटक तर सबकुछ स्त्रियांचं नाटक म्हणून ओळखलं आणि नावाजलं गेलं. दिग्दर्शन, ध्वनीसंयोजन, रंगमंच व्यवस्था, नेपथ्य आणि पुरुष भूमिकादेखील स्त्रियांनीच केल्या होत्या. गणेशोत्सवातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्तानं आतापर्यंत पं. भीमसेन जोशी, पं. हृदयनाथ मंगेशकर, आशा खाडिलकर, पं. प्रभाकर कारेकर, मंगेश पाडगावकर, दशरथ पुजारी, सुलोचना चव्हाण या मान्यवरांची नावं देता येती अनेक दिग्गज उपस्थित राहिले आहेत.

सहनिवासातील ज्ञात-अज्ञात ‘लिहित्या हातांना प्रेरणा देणारे उपक्रम’ अनेकदा राबवले गेले. त्यापकी एक म्हणजे पूर्वी ‘आनंद’ हे हस्तलिखित निघायचं. मधल्या काळात मुलांच्या लिखाणाला आणि रंग-रेषांना वाव मिळण्याच्या दृष्टीने ‘इंद्रधनू’ हे हस्तलिखित काढण्यात आलं होतं. गेली दीड वर्ष ‘परिचय’ हे ‘इंद्रवदन सहनिवासा’चं ‘मुखपत्र’ काढण्यात येत आहे. वेगळं करिअर करणाऱ्यांच्या वेगळ्या वाटांविषयी, चाळ आणि सहनिवासातील आठवणींविषयी, वर्षभरांतील घडामोडींचा वृत्तान्त, स्थानिक जाहिराती आदी साहित्याचा परिचयमध्ये समावेश करण्यात आला.

समाजभान

उत्सव म्हणजे केवळ सेलिब्रेशन इतका संकुचित विचार इथल्या रहिवाशांनी कधीच केला नाही. तर आपण समाजाचंही देणं लागतो या कृतज्ञतेच्या भावनेनं अनेकांनी सामाजिक कार्यातला वाटा उचललेला दिसतो. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक, देशभक्त मंडळींच्या सभा आणि वास्तव्य या वास्तूमध्ये झालं होतं. हुतात्मा भगतसिंग त्यांच्या विजनवासाच्या काळात तत्कालीन चाळीतील मोघे यांच्या घरी एक रात्र राहिले होते. नंतर एकदा त्यांच्या बहिणीनं चाळीला भेट दिली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठीचा सत्याग्रह असो, चीन आणि पाकिस्ताननं छेडलेल्या युद्धांच्या प्रसंगी ब्लॅकआऊटच्या काळात चाळीतील पुरुषांनी रात्रभर आळीपाळीनं जागून घातलेली गस्त असो किंवा रक्तदान शिबीर असो किंवा पानशेतच्या पुराच्या प्रसंगी केलेलं मदतकार्य असो, प्रत्येक वेळी रहिवाशांनी एकत्रितपणं मदतीचा हात पुढे केला. स्त्रियांचं सबलीकरण आणि सक्षमीकरणाविषयी स्त्रियांनी कार्यक्रम सादर केले आहेत.

श्रीगणेशाच्या आगमनाचा सोहळा साधासा व घरगुती स्वरूपाचा असतो. मंडळाचे अध्यक्ष, कार्यकत्रे आणि रहिवासी गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीनं सहनिवासात आणतात. गेली काही र्वष यात वाद्यपथकाची भर पडली आहे. तर विसर्जन सोहळा हा ‘खाशा इंद्रवदन पद्धती’नं साजरा होतो. गणेशाच्या विसर्जनासाठी एके काळी पालखी छबिलदास हायस्कूलमधून आणली जात असे. आता सहनिवासाकडे स्वत:ची पालखी असून तिला फुलांची सजावट केली जाते. सार्वजनिक गणेशमूर्तीसह रहिवाशांपकी काहींच्या घरचे गणपतीही पालखीत विराजमान होतात. विसर्जनाची मिरवणूक सहनिवासाबाहेर पडण्याआधी मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाते.

यंदाच्या शतक महोत्सवी वर्षांच्या निमित्तानं सहनिवासात वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी शतकमहोत्सवी वर्षांच्या खास बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. इंद्रवदनमधल्या अनेक माहेरवाशिणींनीदेखील आपापल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळात वेळ काढून विविध कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली. रहिवाशांच्या इंद्रनिनाद या ढोलताशा व लेझीम पथकाचा श्रीगणेशा या काळात गिरवला गेला आहे. इंद्रवदनचा स्थापना दिवस मोठय़ा आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सहनिवासातील रहिवाशांनी मिळून इंद्रवदनचं सुरेल थीम साँग तयार करण्यात आलं आहे.

सलग शंभर र्वष एखादा उत्सव साजरा करणं, ही वाटते तितकी साधी गोष्ट नव्हे. मग हा तर सार्वजनिक गणेशोत्सव! मधल्या एका टप्प्यावर काही ना काही कारणांमुळं उत्सव साजरा होतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. काहीशी मरगळ आलेली. पण त्या त्या वेळी कधी महिला वर्गाच्या पुढाकारानं तर कधी तरुण कार्यकत्रे खंबीरपणं उभं राहिल्यानं उत्सव पार पडला. कालमानाप्रमाणं उत्सवाचं स्वरूप बदललं आणि ते बदलणार होतंच. मग ते उत्सव साजरं करणं असो, त्यासाठीची धावपळ असो. मात्र गणेशोत्सव या सगळ्या उत्सवांत प्रमुख ठरणाऱ्या उत्सवाच्या निमित्तानं सगळं इंद्रवदन पटांगणात एकवटतं, तेव्हा नानाविध क्षेत्रांत मानाच्या स्थानी असणाऱ्या इंद्रवदनवासीयांची मांदियाळी बघण्याजोगी असते. तेव्हा सगळे जण इंद्रवदनचे रहिवासी म्हणून गणरायाची आराधना करतात. म्हणूनच बहुधा एकजूट, स्वावलंबन, कलागुण आणि इंद्रवदनवासीपणा या चार खांबांवर इंद्रवदनच्या ‘गणेशोत्सवा’चा डोलारा तोलून धरलेला आहे.
सौजन्य – लोकप्रभा