मोठ्या उत्साहात आणि जड अंत:करणाने दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती बाप्पांना गुरूवारी निरोप देण्यात आला. गेले 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरूवारी 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषणात बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या मिरवणुकीत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज होती. गणपती विसर्जन सुरळीत व्हावं यासाठी मुंबईत 50 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. तसंच पोलीसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली होती.तर संपूर्ण राज्यभरात 2 लाखांच्यावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तर सर्वत्र सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पोलिसांकडून काळजी घेण्यात आली होती. तसंच विसर्जनादरम्यान वाहतुककोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनीही काळजी खबरदारी घेतली होती. पुढील वर्षी बाप्पा लवकर येणार आनंदाची बाब म्हणजे लाडका बाप्पा पुढील वर्षी 11 दिवस लवकर येणार आहे. पुढील वर्षी शनिवार 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.