महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चालढकल करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. त्यांची आज अजित पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकार मराठा आंदोलकांना खेळवत असल्याचाही आरोप केला तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची चालढकल सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपा-सेना सरकारने फक्त मराठा आरक्षणाची घोषणा केली, प्रत्यक्ष कृती काही केली नाही. गेल्या चार वर्षांपासून हे सरकार आंदोलनकर्त्यांशी खेळ करतं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरु आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. आज हा मुद्दा आम्ही हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार आहोत असेही अजित पवारांनी म्हटलं आहे.

निवडणुका जवळ आल्याने भाजपाला राम, रामाचे मंदिर यांची आठवण आली आहे. चार वर्षात या सरकारला राम आठवला नाही, रामाला यांनी वनवासात पाठवलं. जनतेने या सरकारचा खरा चेहेरा ओळखला पाहिजे असेही आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले. मुख्यमंत्र्यांवरही अजित पवारांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री, इतर मंत्री मुंबईत असतात ते मराठा बांधवांशी चर्चा करू शकले असते. मात्र त्यांनी कोणताही पुढाकार घेतला नाही. मराठा बांधवांनी काळी दिवाळी साजरी केली तरीही सरकारला त्याचा काही फरक पडलेला नाही. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

राजकीय इच्छाशक्ती असेल तर सरदार पटेलांचा सर्वात उंच पुतळाही उभारला जाऊ शकतो पण मग मराठा बांधवांचं काय? पिढ्यान पिढ्या शहरांची नावं आहेत मात्र ती नावं बदलली जात आहेत. त्याहीपेक्षा देशातला महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे. महाराष्ट्र राज्याची प्रगती व्हायला हवी होती ती अधोगती होते आहे. राज्याच्या विकासाला सरकारने प्राधान्य द्यायला हवं मात्र हे सरकार राजकीय पोळी भाजून घेते आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला.