जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने जनतेने काळजी करू नये, अशी ग्वाही राज्य सरकारकडून सातत्याने दिली जात असताना राज्यातील अनेक भागांत धान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. घाऊक व्यापाऱ्यांकडे पुरेसा साठा असला तरी या मालाची वाहतूक करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने तसेच मालाची चढउतार करण्याकरिता मजूर उपलब्ध नसल्याने मुंबई, ठाणे, पुण्यासह विदर्भातील किरकोळ व्यापारी किं वा किराणा मालाच्या दुकानांमध्ये पुरेसे धान्य मिळत नसल्याचे अनुभव ग्राहकांना येऊ लागला आहे. त्यामुळे धान्यांचे दर गगनाला भिडू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत पुरेसा साठा असतानाही गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसरास होणारा अन्नधान्याचा पुरवठा जवळपास निम्म्यावर आला आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या बरोबरीने धान्याचे दरही वाढू लागले आहेत. करोनाचे संकट निर्माण होताच माथाडी तसेच माथाडी कामगारांनी काम बंद केले. त्यामुळे या बाजारात मालाचे चढ-उतार करण्याचे काम मंदावले असून मुंबई, ठाण्यातून या बाजारात खरेदीसाठी येणारे किरकोळ व्यापारीच त्यांच्या कामगारांमार्फत हे काम करताना दिसत आहेत. तसेच अनेक किरकोळ विक्रेत्यांनी या बाजाराकडे पाठ फिरवल्याने पूर्वीसारखा उठाव नसल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली यासारख्या शहरांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये किराणा मालाची काही ठराविक दुकाने सध्या उघडी असताना दिसत आहेत.

शहरांचा पुरवठा निम्म्यावर

टाळेबंदीमुळे देशांतर्गत होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वस्तू आणि मालाची वाहतूक सुरु आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या मालाचे ट्रक गेल्या आठवडय़ात राज्यात विविध ठिकाणी अडवले जात होते. त्यामुळे बाजार समितीतील मालाची आवक घटली होती. गेल्या काही दिवसांपासून वाशी कृषी उत्पन्न बाजारात भाजीपाला, फळे, अन्न धान्याची आवक सुरळीत सुरु झाली आहे. मात्र, टाळेबंदीमुळे बाजारात काम करणारे अनेक हमाल कामावर उपस्थित राहू शकत नसल्याने प्रमुख शहरांचा अन्नधान्याचा पुरवठा रोडावला आहे. कामगार नसल्यामुळे बाजारात माल उतरवण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती अन्नधान्या बाजारातील व्यापारी मुकेश गाला यांनी ‘लोकसत्ता‘शी बोलताना दिली.

सध्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १५० ते २०० अन्न-धान्याच्या गाडय़ा येत आहेत.

पुण्यात वाहतुकीचा प्रश्न

पुण्यातील भाजी मंडई आणि भुसारा बाजारात धान्य आणि भाजीपाला मुबलक उपलब्ध असला तरी शहरात वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. शहराच्या काही भागांमध्ये किराणा मालाच्या दुकानांमध्ये धान्य मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रोरी आहेत. पुण्याच्या भुसारा बाजारात मुबलक धान्य साठा उपलब्ध असला तरी हा शहराच्या विविध भागांमध्ये पोहोचविण्याचे मोठे आव्हान असल्याचे ‘दी पुना र्मचट चेंबर’चे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. भाजीपालाही मुबलक उपलब्ध असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी स्पष्ट के ले. पुणे शहरात धान्य किं वा भाजीपाल्याची वाहतूक करता येत नाही, अशी व्यथा वाहतूकदारांनी बोलून दाखविली.

विदर्भातही अपुरा पुरवठा

टाळेबंदीमुळे धान्याची आवक कमी झाल्याने विदर्भातही विविध किराणा दुकानातील धान्याचा साठा आता संपण्याच्या मार्गावर आहे. धान्यासह किराणा साहित्याचाही अवस्था तशीच आहे. गोदामातून दुकानात माल आणण्यासाठी कामगार नाही. त्यामुळे घाऊक विक्रेत्याकडून किरकोळ  विक्रेत्यांकडे माल पाठवण्याची व्यवस्था कोलमडली आहे. ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात सुरूवातीला धान्य व किराणा मालाचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे दुकानात आता किराणा व धान्यच उपलब्ध  नाही. काही ठिकाणी आहे ते निकृष्ट दर्जाचे आहे. मागणी वाढल्याने तेलाचाही तुटवडा आहे. नागपुरात मुदतबाह्य़ तेलाची विक्री करताना व्यापाऱ्यांना पकडण्यात आले. यासंदर्भात कळमना बाजार धान्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गोपाळ कळमकर यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही शेतकऱ्यांकडून धान्य घेतो व त्यावर प्रक्रिया दुसरे व्यापारी करतात आणि त्यांच्याकडून बाजारात माल जातो, असे सांगितले.

धान्याचे दर रु/किलो

चवळी बी १२० -१३०

हरभरा   १०० -११०

मसुर    १०० -११०

तूरडाळ   १२०- १३०

मूगडाळ  १४० -१५०

वाल १२० -१३०

ज्वारी    ३५ -४०

बाजरी   ४० -४५

वाटाणा   ९० -१००

वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या अन्नधान्याची आवक सुरळीत आहे. मात्र, मालाची चढउतार करण्यासाठी ५० टक्के च मजूर उपस्थित आहेत. त्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे.

– अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी, वाशी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grain scarcity in the state abn
First published on: 02-04-2020 at 01:15 IST