भारतात आजही अनेक लोक अनवाणी फिरत असतात. त्यांना खायची भ्रांत असते, तर चप्पल कोठून घेणार? त्यामुळे आपल्या तळव्यांचीच चप्पल बनवून रस्तोरस्ती फिरत असतात. अशा अनवाणी लोकांच्या पायात चप्पल पोहोचवण्याचे स्वप्न श्रेयांस भंडारी आणि रमेश धामी या दोन धावपटूंनी उराशी बाळगले आणि कामाला सुरुवात केली. त्यांनी याकडे सुरुवातीला समाजसेवी संस्था म्हणून पाहिले. मात्र पुढे चप्पल बुटांची विक्री करून निधी उभारून त्यातून समाजसेवा करण्याचे ठरविले. त्याच्या या अभिनव व्यवसायाला अनेकांनी गौरविले आहे. पाहू या कशी उभी राहिली धावायची आवड असणारा श्रेयांस आणि रमेश हे दोघेही वर्षांला अनेक किमी अंतर धावत असतात. हा प्रवास करताना ते वर्षांला किमान तीन ते चार स्पोर्टस् शूज फेकून देत असत. एक दिवस त्यांच्या लक्षात आले की आपण जे बूट फेकतो त्याचा सोल उत्तम असतो. केवळ आतला काही भाग आणि वरचा काही भाग फाटतो अथवा खराब होतो. मग या सोलचा वापर करून काही करता येईल का? आणि त्यांचे काम सुरू झाले. जयहिंद महाविद्यालयात व्यवस्थापन शिक्षण घेऊन त्याने बॉबसन महाविद्यालयातून आत्रप्रेन्युअल लीडरशिपचे शिक्षण पूर्ण केलेला श्रेयांस हा तरुण वयापासून पर्यावरणप्रेमी आणि पक्षीप्रेमी आहे. बीएनएचएस आणि राजस्थान पर्यटनच्या माध्यमातून त्याने ‘बर्ड ऑफ अरवलीज’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. तर त्याचा धावपटू मित्र रमेश हा मूळचा उत्तराखंडचा असल्याने जन्मत:च त्याचे निसर्गावर प्रेम जडले. रमेशने कोणतेही खास शिक्षण घेतलेले नाही. मात्र या दोघांच्या पर्यावरणप्रेमाने त्यांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्यास सुरुवात केली. जुन्या बुटाचा सोल वापरून त्याची स्लीपर तयार करता येईल अशी संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. यानंतर त्यांनी त्यावर अधिक काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्यांच्या असे लक्षात आले की जगभरात एका वर्षांच्या कालावधीत ३५ कोटी स्पोर्टस् शूज फेकले जातात; तर भारतात एक अब्जाहून अधिक लोक चपलांशिवाय जगत आहेत. मग या दोघांनी अशा अनवाणी जगणाऱ्या प्रत्येकाच्या पायात चप्पल गेली पाहिजे असे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. यातून त्यांनी बुटाच्या सोलपासून स्लीपर बनवण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार स्लीपर बनविल्या व त्याचा उपयोगही अनेकांना होऊ लागला. या स्लीपरची आणि ग्रीनसोलमध्ये तयार होणाऱ्या इतर चपलांची रचना सध्या बाजारात असलेल्या पादत्राणांपेक्षा वेगळी आहे. यामुळे त्यांनी या रचनेचे स्वामित्व हक्कही मिळवले. आपण आपल्याकडील जुन्या चप्पल किंवा बूट फेकून देतो. अशा फेकण्याच्या अवस्थेत असलेल्या चप्पल आणि बूट ग्रीन सोलमध्ये गोळा करतात. या जुन्या चपलांच्या माध्यमातून नवीन चप्पल बनविल्या जातात. पनीचे कार्यालय नवी मुंबईत असून त्यांचे चप्पल उत्पादन केंद्रही आहे. ५० चप्पल अथवा बूट विकल्यावर १०० जणांना मोफत चप्पल उपलब्ध करून द्यायचा असा कंपनीचा नियम आहे. अशा आगळय़ा प्रकारे हे काम सुरू असून याला समाजातून तसेच उद्योग क्षेत्रातून खूप वाहवा मिळत आहे. श्रेयांसची ही संकल्पना अनेक व्यवसाय नियोजन स्पर्धामध्ये गौरवास पात्र ठरली आहे. यामध्ये आयआयटी मुंबईत पार पडणाऱ्या ‘युरेका’ या स्पध्रेचा समावेश आहे, तर टाटा फर्स्ट डॉटतर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या सर्वोत्तम २५ नवउद्योगांच्या यादीतही २०१५मध्ये ग्रीन सोलला स्थान मिळाले होते. याशिवाय अहमदाबाद येथील ईडीआयआयच्या सवरेत्कृष्ट ३० कल्पक उद्योगांच्या यादीतही यांचा समावेश करण्यात आला आहे. गुंतवणूक आणि उत्पन्न स्रोत या कंपनीमध्ये सुरुवातीला कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून पैसे उभे करण्यात आले. आजही अनेक कंपन्या त्यांना निधी पुरवीत आहेत. मात्र स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी ग्रीन सोल या ब्रँड नावाने काही नवे बूट आणि चप्पल विकून त्यातून पैसे कमावीत आहेत. हे पैसे पुन्हा याच कंपनीत गुंतविले जात आहेत. नवउद्यमींना सल्ला नवउद्योगाची सुरुवात करताना खूप मेहनत घ्यावी लागते. याचबरोबर खूप वेळही द्यावा लागतो; तरच आपली कल्पना प्रत्यक्षात येणे शक्य होते असे श्रेयांस सांगतो. याचबरोबर आपल्यासोबत योग्य चमू असणेही महत्त्वाचे असल्याचा मौलिक सल्ला श्रेयांसने नवउद्यमींना दिला आहे. भविष्यातील वाटचाल या कंपनीच्या माध्यमातून २०१५मध्ये १० हजार अनवाणी लोकांना चप्पल पुरविण्यात आली. या वर्षांत ५० हजार अनवाणी लोकांच्या पायात चप्पल पुरविण्याचा त्यांचा मानस आहे, तर त्यांच्या या उपक्रमातून ४५ हजार एलबीएसचा कार्बन उत्सर्ग रोखण्यात यश आल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. मी जे काम करतो त्याचा लोकांना अभिमान वाटला पाहिजे हे माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट असल्याचे श्रेयांस सांगतो. सुरुवातीला देशभरातील सर्व जुन्या स्पोर्टस् बुटांच्या माध्यमातून स्लीपर्स बनविण्याचा आमचा मानस आहे. हा मानस पूर्ण झाल्यानंतर जगभरातील इतर देशांमध्येही आम्हाला पोहोचायचे असल्याचे श्रेयांसने नमूद केले. @nirajcpandit