ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार परिसरात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचे झाड नजीकच्या झोपडय़ांवर कोसळल्याने तेथे राहणारे पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेत १७ झोपडय़ांचे नुकसान झाले आह़े  नरीबाई राठोड (२७), चिनीबाई राठोड (२७), शिवा चव्हाण (३०), रतन चव्हाण (३५) आणि रवी चव्हाण (२७) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
येथील हरी शेख तलावाजवळील एक जुने गुलमोहर झाड मंगळवारी पहाटे उन्मळून पडले. त्या खालील झोपडय़ांच्या पत्र्यावर हे झाड कोसळल्याने येथील सुमारे १७ झोपडय़ा जमीनदोस्त झाल्या आणि आत झोपलेले नागरिक जखमी झाल़े
गंभीर जखमींना कळव्याच्या छ़ शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आल़े  या झोपडय़ा चार ते पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या असून त्यात लमाणी समाजाचे लोक राहत होते. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत झाड हटवून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.