देशभरातील शेवटच्या टप्प्यातील बहुप्रलंबित हार्बर मार्गावरील डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाच्या चाचणीतील प्रमुख टप्पा पार झाल्याने या मार्गावर लवकरच जलदगती गाडय़ा धावणार आहेत. येत्या १५ जूनपर्यंत हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासाने घेतला आहे. यात त्याचा वेग किमान १०० किमी प्रतितास करण्याचा विचारही सुरू झाल्याने येत्या काळात प्रवासवेळेतबचत होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
सध्या हार्बर मार्गावर ५३५ फे ऱ्या चालवल्या जातात. मात्र यातील अनेक गाडय़ा जुन्या झाल्यानंतरही धावत असल्याने या मार्गावर तांत्रिक बिघाड होत असतात. यात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या या मार्गावरील लोकलचा वेग साधारण ८० किमी प्रतितास इतका आहे. हा वेग १०० किमी प्रतितासापर्यंत जाणार असल्याने प्रवासवेळेत बचत होणार असल्याचा दावा रेल्वे अधिकारी करत आहेत. याशिवाय विजेवर होणाऱ्या कोटय़ावधी रुपयांच्या खर्चातही बचत होणार असल्याचेही सांगण्यात आले.

आजपासून उन्हाळी विशेष गाडय़ांचे आरक्षण
कोकण मार्गावर धावणाऱ्या उन्हाळी विशेष गाडय़ांचे आरक्षण आजपासून सुरू होणार आहे. यात गाडी क्रमांक ०१०९५/९६-दादर-सावंतवाडी आणि०१००५/०६ लोकमान्य टिळक टर्मिनस करमाळी आदी गाडय़ांचा समावेश आहे. तर इतर मार्गावरील दादर-भुसावळ, दादर-झारप, आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर आदी गाडय़ांचाही सामवेश आहे.