सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सध्या हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळा ते सीएसटी या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत हा बिघाड झाला आहे. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सध्या सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या तब्बल अर्धा तास उशीराने धावत आहेत. या गोंधळामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरदेखील तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गैरसोय झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आज हार्बर मार्गावर होताना दिसत आहे. त्यामुळे इजा झाला, बिजा झाला आणि आता तिजा झाला, असेच म्हणण्याची वेळ रेल्वे प्रवाशांवर आली आहे.