रुग्णांच्या नातेवाईकांकडून हुज्जत घातली जात असल्याने डॉक्टर, परिचारिका तणावाखाली मनुष्यबळाचा अभाव असल्याने महापालिकेने महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांची कुमक घेऊन मोठमोठय़ा रुग्णालयांतील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी दिली असली तरी लहानसहान आराजारांकरिता मुंबईकरांना सेवा देणारे पालिकेचे दवाखाने आणि आरोग्य केंद्रांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचीही तसदी आरोग्य विभागाने घेतलेली नाही. परिणामी, दवाखाने, आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचारी, उपचारासाठी येणारे रुग्ण, लसीकरणासाठी येणारी बालके, गरोदर महिला आणि त्यांचे नातेवाईक यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या तीन प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये मोठय़ संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांवरील उपचारांवरून त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामध्ये तणावाचे प्रसंग निर्माण होतात आणि प्रसंगी प्रकरण हातघाईवर येते. मुंबईत निवाऱ्याची व्यवस्था नसलेल्या अनेक व्यक्ती पालिका रुग्णालयातील एखाद्या कोपऱ्यात दररोज रात्री बस्तान मांडतात. सकाळ होताच रुग्णालयातील सार्वजनिक प्रसाधनगृहात अंघोळ उरकतात आणि कामाला निघून जातात. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. काही दवाखाने आणि आरोग्य केंद्रे पालिकेची रुग्णालये आणि पालिकेच्या मोठय़ा कार्यालयांत आहेत. रुग्णालय आणि मोठय़ा कार्यालयांमधील तैनात सुरक्षारक्षकांचे तेथील दवाखाने आणि आरोग्य केंद्रावर लक्ष असते. मात्र अन्य ठिकाणी असलेले दवाखाने आणि आरोग्य केंद्रांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. काही वेळा रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक तेथील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांना सहन करावी लागते. हे दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एकूणच दवाखाने आणि आरोग्य केंद्रांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु प्रशासन आणि नगरसेवक या प्रश्नाकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. जबाबदारी झटकणाऱ्यावर भर केईएममध्ये ६८, नायरमध्ये ३८, तर लोकमान्य टिळक रुग्णालयात २० खासगी सुरक्षा मदतनिसांची नियुक्ती केली आहे. या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना केवळ मार्गदर्शन करण्याचे काम या खासगी सुरक्षा मदतनिसांवर सोपविली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी यांचा विशेष उपयोग होत नाही. त्याचबरोबर पालिकेने महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळाचे १४३ सुरक्षारक्षक केईएममध्ये, १३५ लोकमान्य टिळकमध्ये, ९३ नायरमध्ये, तर २९ सुरक्षारक्षक आर. एन. कूपरमध्ये तैनात आहेत. राज्य सुरक्षारक्षक महामंडळाचे सुरक्षारक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत. मात्र पालिकेचे सुरक्षारक्षक व राज्य सुरक्षारक्षक मंडळाच्या रक्षकांमधून विस्तव जात नाही.