राज्य शासनाने आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देताना ९७१ प्रकारच्या गंभीर आजारांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना राबविल्याचा मोठा फायदा राज्यभरातील रुग्णांना झाला. २०१५-१६ मध्ये तीन लाख ६४ हजार रुग्णांवर जीवनदायी योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले असून यासाठी शासनाने ८७८.९५ कोटी रुपये खर्च केले. यंदाच्या वर्षांत आतापर्यंत तीन लाख १७ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ७३७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तत्कालीन युती शासनाच्या काळात आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांच्या पुढाकारातून जीवनदायी योजना आकाराला आली होती. प्रामुख्याने हृदयविकार, मज्जासंस्था, मेंदूच्या शस्त्रक्रिया अशा प्रमुख व खर्चीक उपचार असलेल्या आजारांमध्ये दारिद्रय़रेषेखालील गरीब रुग्णाला उपचार मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या वेळी पन्नास हजार रुपये रुग्णाला उपचारासाठी मिळत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची व्याप्ती वाढवून ९७१ आजारांचा समावेश केला तसेच रुग्णालयांची संख्या वाढवताना उपचारासाठी देण्यात येणाऱ्या खर्चाची रक्कम अडीच लाख रुपये एवढी केली. परिणामी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना याचा लाभ मिळाला असून नाशिक जिल्ह्य़ातून सर्वाधिक म्हणजे ९० हजार रुग्णांनी या योजनेचा गेल्या वर्षी लाभ घेतला. त्यापाठोपाठ कोकण विभागात ८६ हजार, पुणे विभागात ८३ हजार, तर अमरावती विभागात २१ हजार आणि नागपूर विभागात ३१ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एड्स रुग्ण आरोग्य विभागाच्या जनजागृती मोहिमेमुळे गेल्या तीन वर्षांत एचआयव्ही-एड्सच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी एड्सच्या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात मात्र वाढ होताना दिसत आहे. २०१४ साली एड्सच्या रुग्णांची संख्या २४ हजार होती, ती २०१५ साली १९ हजार नोंदविण्यात आली, तर यंदाच्या वर्षी १५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. या पाश्र्वभूमीवर एड्सच्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी तीन हजार ६८ जणांचा मृत्यू झाला, तर गेल्या वर्षी तीन हजार ७३ आणि यंदाच्या वर्षी चार हजार ६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.