जून ते सप्टेंबरदरम्यानची सरासरी ओलांडली

मुंबई : अलीकडच्या काळात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पर्यावरणीय विषयांतील ‘वातावरण बदल’ या घटकाचा प्रत्यक्ष अनुभव यंदाच्या पावसाळ्यात येत आहे. यंदा मोसमी पावसाने जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील सरासरी जुलैअखेर दोन महिन्यांत ओलांडल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. मुंबईतही हीच स्थिती थोड्याच दिवसांत दिसणार आहे.

अलीकडच्या काळात वातावरणीय बदलांमुळे पावसाचे वेळापत्रक, कालावधी, तीव्रता यांत बदल होताना दिसत आहे. यंदाही पावसाच्या लहरीपणात वाढ झाली असून काही दिवस पूर्ण विश्रांती तर काही दिवस धुमाकूळ अशी त्याची स्थिती आहे. १७ आणि १८ जुलैच्या पहाटे पावसाच्या सरींनी तीव्र मुसळधार स्वरूप धारण के ल्याने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढवली आणि दरडी कोसळल्या.

जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाने जून ते सप्टेंबरमधील सरासरी ओलांडली आहे. म्हणजेच अनेक ठिकाणी चार महिन्यांचा पाऊस दोन महिन्यांतच झाला आहे.  मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी २२०५.८ मिमी इतकी आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत उपनगरात २०८०.८ मिमी पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे लवकरच मुंबईतील पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे. राज्यभरात इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. सरासरी आणि यंदाचा पाऊस यांतील सर्वाधिक तफावत परभणी येथे आढळली आहे. येथील सरासरी ३५४.७ मिमी असून यंदा ६२८.६ म्हणजेच ७७ टक्के  अधिक पाऊस झाला आहे. त्याखालोखाल सातारा येथे ६१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. येथे सरासरी ४९०.९ मिमी असून या वर्षी ७९२.६ मिमी पाऊस पडला. धुळे, जळगाव, नंदुरबार येथे मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

आता अ‍ॅपद्वारे पिकांची नोंदणी : पीक पाहणी नोंदणीतील घोळ दूर करण्याबरोबरच शेतकऱ्यांनी केलेल्या लागवडीची अचूक माहिती नोंदली जावी आणि दुष्काळ किं वा अतिवृष्टीत योग्य तो मोबदला मिळावा यासाठी महसूल विभागाने स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित के ला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनापासून ई-पीक अ‍ॅपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी सुरू के ली जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिली.

पूरग्रस्तांच्या वीज देयक वसुलीला स्थगिती

सांगली : पूरबाधितांच्या वीज देयक वसुलीला स्थगिती देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले. मात्र त्यांच्या वीज देयकांना माफी देण्याचे अधिकार केवळ मंत्रिमंडळालाच असल्याने याबाबत आपण आश्वाासन देण्यास असमर्थ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.