मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. परंतु संध्याकाळनंतर पावसाचा जोर अचानक वाढला. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरलं. त्यामुळे बेस्टची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा परिसरात १२२.२ मिमी आणि सांताक्रुझ येथे २७३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अशी असेल बेस्टची वाहतूक

-उड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी

-भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट

-सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४

-मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)

– लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार

– भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव

-जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे

रात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांचाही खोळंबा झाला होता. शीव रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती.