रिपब्लिक वृत्त वाहिनीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावरील दोन्ही गुन्ह्यांबाबतच्या कारवाईची प्रक्रिया मंगळवारी तात्पुरती थांबवत उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. पालघर येथील साधुंचा झुंडबळी तसेच वांद्रे स्थानकाबाहेरील स्थलांतरितांची गर्दी याबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते रद्द करण्याच्या मागणीसाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोस्वामी यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे नमूद करत न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने कारवाईस स्थगिती दिली.