मुंबई : विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (२२ फेब्रुवारी) आयोजित केलेला जनता दरबार रद्द करण्यात आला आहे. करोना विषाणू बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबई आणि एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. वरळी येथील नेहरू केंद्रात हा कार्यक्रम होणार होता. मात्र, मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे ट्विट सामंत यांनी रविवारी रात्री केले. परिस्थिती निवळल्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

महाविद्यालये बंद असताना जनता दरबारासाठी येण्याचे आवाहन, पुणे येथील कार्यक्रमात झालेली गर्दी, खर्च अशा अनेक कारणांमुळे हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. अखेर तो रद्द करण्याचा निर्णय मंत्र्यांनीच घेतला आहे.