मुंबईत सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते वाहतुकीसह लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अतिवृष्टी होत असल्याने मुंबई आणि उपनगरातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालयं आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरूच राहणार आहेत.

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात सोमवार संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट असून पुढचे ४८ तास असाच मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तरेस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता त्याचबरोबर अरबी समुद्रात पूर्व-मध्यावर किनारपट्टीच्या उत्तरेस चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ४ आणि ५ ऑगस्टला काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचा इशारा (रेड अर्लट) देण्यात आला आहे.