मुंबई : ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा दप्तराचा भार कमी झाला असला तरी विक्रेत्यांना याच दप्तरांचे ओझे आता पेलेनासे झाले आहे. गेली दोन शैक्षणिक वर्षे मागणी नसल्याने शालोपयोगी वस्तू पडून आहेत. हीच अवस्था गणवेश विक्रेत्यांची आहे. मागणी नसल्याने दप्तर आणि गणवेश उत्पादकांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

शाळेच्या परिसरातील गणवेश विक्रे त्यांशी संवाद साधला असता गणवेशाची मागणी अवघी २५ टक्क्यांवर आल्याचे त्यांनी सांगितले. ‘निर्बंध आणि सद्य:स्थितीचा विचार करून बहुतांशी शाळांनी गणवेशाची सक्ती केलेली नाही. त्यामुळे किरकोळ ग्राहकच गणवेश खरेदी करत आहेत. आमच्या दुकानात जवळपास सहा ते सात शाळांचे गणवेश उपलब्ध आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांत मागणीच नसल्याने कपडे धूळ खात पडल्याची खंत शीव येथील ‘गुड लक ड्रेसेस’च्या मनोज यांनी व्यक्त के ली.

अशीच अवस्था दप्तर विकेत्यांची आहे. शाळा सुरू होण्याआधी आणि नंतरचे काही महिने दप्तर विक्रेत्यांकडे गर्दी पाहायला मिळते. यंदा मात्र ही दुकाने ओस पडली आहे. ‘शैक्षणिक वर्ष सुरू होताच नवीन दप्तर खरेदी करणे, मुलांना आकर्षित करतील असे दप्तर तयार करून घेणे अशी आमची पूर्वतयारी सुरू होते. गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे व्यवसायच झाला नाही आणि यंदाही तशीच परिस्थिती आहे. दोन वर्षांत विक्री झाली नसल्याने काही साहित्याचे नुकसानही झाले आहे,’ असे रेहमान स्ट्रीटवरील दप्तर विक्रेत्यांनी सांगितले.

जूनमध्ये शाळा सुरू होत असल्याने आम्ही मार्चपासूनच तयारीला लागतो. गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू झाल्याने नवीन साहित्याचे उत्पादन करता आले नाही. शिवाय शाळांनाही टाळे असल्याने तो हंगाम वाया गेला. या वर्षी मार्चमध्ये आम्ही तयारीला लागणार तितक्यात संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले. यंदाही शाळा खुल्या होण्याची चिन्हे कमी आहेत. त्यामुळे शालोपयोगी वस्तूंचे उत्पादन करण्यात आले नाही. जी काही किरकोळ मागणी आहे ती उपलब्ध साठय़ावरच पूर्ण केली जात आहे. दोन वर्षांत ९० टक्के  व्यवसाय बुडाला आहे.

– राजन छेडा, बॅग उत्पादक (गोल्डन बॅग्ज)