वसईतील नायगाव पूर्वेतील टीवरी रस्त्यालगत नव्याने विकसित करण्यात आलेल्या सनटेक इमारतीजवळील भाग खचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. अचानक झालेल्या या भूस्खलनाच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नायगाव पूर्वेतील टीवरी रस्त्यालगत सनटेक परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभारण्याचं काम सुरू आहे. त्यातील काही इमारती पूर्ण झाल्या आहेत. त्यामधील काही सदनिकामध्ये नागरिक राहण्यास आले आहेत. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री २२ मजली इमारतीच्या जवळील जमिनीचा भाग खचून गेल्याची घटना घडली. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच इमारतीमध्ये राहणारे रहिवासी तातडीने खाली उतरले. याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जवळपास ३० ते ४० फूट इतका जमिनीचा भाग खचून गेला आहे. विकासकांच्या निष्काळजीपणामुळे असा प्रकार घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी पदरमोड करीत लाखो रुपये किंमतीच्या सदनिका यामध्ये खरेदी केल्या आहेत. परंतु जमीन खचण्याच्या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण वर्षभरापूर्वी याच इमारतीच्या मागील बाजूस जमिनीचा भाग खचल्याची घटना घडली होती. इतक्या मोठ्या इमारती उभारल्या जातात मोठं मोठे इंजिनिअर याचे आराखडे तयार करतात तरी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

महापालिकेने इमारतींची पाहणी करावी

या भागातील ही दुसरी घटना असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी पालिकेच्या नगरविकास विभागाकडून सदर इमारतींची पाहणी करण्यात यावी. नागरिकांना राहण्यास योग्य आहेत किंवा नाही याची खात्री करावी मगच या विकासकांना पुढील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.