मी तुरूंगातून सुटलोय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी काही दिवसांच्या पॅरोल रजेवर तुरूंगातून बाहेर आलोय, असेच मला वाटत असल्याची भावना संजय दत्तने व्यक्त केली. येरवडा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत तो बोलत होता. यावेळी संजय दत्तने आपला उल्लेख दहशतवादी म्हणून करू नये, अशी विनंतीही प्रसारमाध्यमांना केली. टाडा न्यायालयाने मला दहशतवादाच्या आरोपातून मुक्त केले असून मी शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत होतो, हे संजय दत्तने स्पष्ट केले. दरम्यान, या पत्रकारपरिषदेत संजय दत्तने आजचा दिवस बघायला माझे वडिल हवे होते, अशी भावनाही व्यक्त केली. आगामी काळात मला माझ्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवायचा आहे आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचेही यावेळी संजय दत्तने सांगितले.