चर्चा, चिकित्सा, मूल्यांकनातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला, असं प्रांजळ उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर काढले. ज्ञानेश्वरीपासून प्रेरणा घेऊनच शिवचरित्र लिहिलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. इतिहास हे मौलिक धन आहे. ते माझं एकट्याचं नसून ते सर्वांचं आहे, त्यामुळे त्याचा अवमान करता कामा नये.  मला कधीही अहंकाराचा वारा लागला नाही आणि लागूही देणार नाही, असंही बाबासाहेब पुढे म्हणाले. आज मी दहा लाखांनी श्रीमंत झालेलो आहे. परंतु, पुरस्काराच्या रकमेतले फक्त १० पैसे स्वत:साठी घेणार असून पुरस्काराचे १० लाख व माझ्याकडील १५ लाख, असे २५ लाख रुपये कर्करोग झालेल्या रूग्णांच्या उपचारांसाठी देणार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मदत करणार असल्याचं ते म्हणाले.
‘महाराष्ट्र भूषण’ हा मोठा सन्मान आहे. या पुरस्काराचा मी अतिशय जबाबदारीने स्वीकार करत असून त्यामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे, असं बाबासाहेब यावेळी म्हणाले. बुधवारी बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९४ व्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा राजभवनातील छोटेखानी पण दिमाखदार सोहळ्यात राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.