बुधवारी गुढी पाडवा आहे. हा आपल्या सगळ्यांच्या संकल्पाचा दिवस. मी घरी थांबणार आणि करोनाला हरवणार हा संकल्प करा आणि करोनाला हरवा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.  करोनाचे रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब आहे. सध्याच्या घडीला दोन रुग्ण आयसीयूत आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. गुढीपाडवा हा करोनावर विजय मिळवू या दृढ संकल्पाचा करु असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुणे आणि मुंबईतील नागरिकांकडे कुणीही संशयाने पाहू नये. या भयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी करायाचा आहे असंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. गावात येणाऱ्या लोकांना अडवू नका असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अनेक ठिकाणी डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या आहेत ते बंद करणं योग्य नाही. संचारबंदीतही आरोग्य सेवांना सूट दिलेली आहे. लोक आजारी पडले तर त्यांनी काय करायचं? त्यामुळे ओपीडी बंद करु नका अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केली.

राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यांनी जनतेला पुन्हा एकदा सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.