दिल्लीहून बोलवत नाहीत, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रीपदी राहणार आहे, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. यासोबतच रावसाहेब दानवेदेखील प्रदेशाध्यक्ष पदावर कायम असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘माझे आणि दानवेंचे पद पक्के आहे. आम्ही कुठेही जाणार नाही,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले.

वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन रावसाहेब दानवे यांची गच्छंती होणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. याशिवाय स्वत:देखील केंद्रात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी केंद्रात जाण्याची तूर्तास शक्यता नाही. दिल्लीवरुन बोलावणे येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रीपदावर राहणार आहे,’ असे त्यांनी म्हटले.

रावसाहेब दानवे यांची गच्छंती आणि मंत्रिमंडळाचा विस्तार यांची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबद्दल बोलताना, ‘दानवे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही यापुढेही निवडणुका लढवू,’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. दानवेंच्या गच्छंतीसोबतच फडणवीसांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार असल्याच्या शक्यताही वर्तवल्या जात होत्या. मात्र ‘दिल्लीतून आदेश येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रीपदावर असेन,’ असे म्हणत त्यांनी दिल्लीवारीची शक्यता फेटाळून लावली.