आठवडय़ातून दोन दिवस विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्याचे राज्य सरकारचे आदेश
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने विविध प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आता विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये, पर्यावरण, सुप्रशासनाचे गुण रुजविण्यासाठी चक्क भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांना कामाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सनदी व पोलीस अधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील एक शाळा निवडून तेथे आठवडय़ातून दोन दिवस ज्ञानदानाचे काम करावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि अनुभवकथन व्हावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्याबाबतची योजना तयार करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले होते. त्यानुसार या विभागाने ‘विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद’ ही योजना आखली असून ती देशभर राबविण्यात येणार आहे.

काय आहे योजना..
* राज्यातील सर्व सनदी आणि पोलीस सेवेतील तसेच राज्य सेवेतील वरिष्ठ शासकीय अधिकारी आपल्या परिसरातील एका शाळेत जाऊन विद्याध्र्याशी संवाद साधावा
* आठवडय़ातून दोन दिवस सकाळी एक तास संबंधित शाळेतील इयत्ता आठवीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना एक तास ज्ञानदान करावे
* आपले अनुभव तसेच ज्ञानाच्या माध्यमातून नैतिक मूल्ये, राष्ट्रउभारणी, पर्यावरण संरक्षण, सुप्रशासन आदी मूल्यांवर विद्यार्थाशी संवाद साधावा
* पहिल्या अध्र्या तासात विद्यार्थ्यांना शिकवावे आणि उर्वरित अध्र्या तास त्यांच्याशी थेट चर्चा करावी
* चर्चेदरम्यान सरकारच्या कारभाराची जराही चिकित्सा केली जाऊ नये