एकीकडे सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे पीकविम्यासाठी मोर्चा काढायचा हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असून त्यांना खरोखर शेतकऱ्यांची चिंता असेल आणि त्यांची हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढावा, असे आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज शिवसेनेला केले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावर शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता. यासंबंधी पत्रकारांसोबत संवाद साधतांना वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेने मुंबईत काढलेल्या मोर्चात एकही शेतकरी नाही. त्यांना शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढायचा होता तर जिकडे शेतकरी आहे तिकडे काढायला पाकरतात हिजे होता. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांसाठी या मोर्चाचा देखावा केला. सत्तेत राहून शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत. देणारे तुम्ही मग मोर्चे काढून मागणी करता कोणाकडे ? असा सवाल करून ते म्हणाले की, पीक विम्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याऐवजी त्यांचे मंत्री अधिवेशनात गप्प बसतात आणि आता मोर्चासारखी नौटंकी करतात. सत्तेत राहून प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्तेला लाथ मारा आणि मग रस्त्यावर उतरा, असे आवाहनही त्यांनी शिवसेनेला केले.

पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक कशी शेतकऱ्यांना लुबाडून स्वतःचे खिसे कसे भरतात हे पुराव्यानिशी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारच्या निर्दशनाला आणून दिले. तेव्हा शिवसेनेचा एकही मंत्री बोलला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढलेला मोर्चा ही शिवसेनेची निव्वळ दुटप्पी भूमिका आहे. शिवसेनेला शेतकऱ्यांचा खरेच कळवळा असता तर सत्तेचा आसूड वापरून पीकवीमा कंपन्यांना सरळ केले असते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असता, परंतु यांना शेतकऱ्यांच्या हिताशी काही देणेघेणे नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.