झाकीर नाईक हे दहशतवादाचा प्रचार करत असतील तर अशावेळी आपल्या सुरक्षायंत्रणा काय करत आहेत, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी उपस्थित केला आहे. झाकीर नाईक यांच्यावर दहशतवादाच्या प्रचाराचा आरोप होतो. मग अशावेळी आपल्या सुरक्षायंत्रणांचे अधिकारी काय करत आहेत, आपल्या गुप्तचर यंत्रणा झोपा काढत होत्या का, असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला. याबाबत भाजपच्या सत्यपाल सिंग यांना लाज वाटायला हवी. ते पूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांनी तेव्हाच झाकीर नाईक यांच्यावर कारवाई करायल हवी होती. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे कोणताच पुरावा नव्हता. नाईक यांना विनाकारण लक्ष्य करण्यात येत असल्याचे सांगत आझमींनी त्यांची पाठराखण केली होती. नाईक यांच्यावर जाणुनबुजून आरोप होत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, असे आझमी यांनी बजावले आहे. बांगलादेशातील गुलशन भागातील हल्ल्यात २२ जण ठार झाल्याच्या घटनेतील दहशतवाद्यांनी भारतीय धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या शिकवणीपासून प्रेरणा घेतल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयए व गुप्तचर खाते (आयबी) तसेच इतरांनी त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नऊ पथके नेमली आहेत. त्याच्या भाषणांच्या चित्रिफितींचा अभ्यास करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. गृहमंत्रालयातील विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या भाषणांच्या सीडी बघण्यासाठी चार पथके नेमली आहेत व समाजमाध्यमांवर तो टाकीत असलेला मजकूर तपासण्यासाठी तीन पथके नेमण्यात आली आहेत. नाईक याच्या फेसबुक पोस्ट तपासण्यासाठी खास पथके नेमण्यात आली आहेत.

झाकीर नाईक यांना दहशतवादाचा समर्थक संबोधणे चुकीचे- एमआयएम