नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील क्यूएस (क्वाकक्वारेली सायमंड्स) या ब्रिटिश कंपनीने केलेल्या भारतीय शिक्षणसंस्थांच्या मूल्यमापनात आयआयटी-मुंबईला सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे. तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूला दुसरे आणि आयआयटी-मद्रासला तिसरे स्थान मिळाले आहे.

विशेष म्हणजे याच कंपनीने यापूर्वी केलेल्या जागतिक पाहणीत भारतात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूला सर्वात चांगले मानांकन मिळाले होते.

या विरोधाभासावर स्पष्टीकरण देताना कंपनीच्या जनसंवाद विभागाच्या संचालिका सिमोना बिझोझिरो यांनी सांगितले की, जागतिक आणि भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांच्या मानांकनाठी वापरलेले निकष वेगवेगळे होते. त्यामुळे एकाच संस्थेचा जागतिक यादीत आणि भारतीय यादीत वेगळा क्रमांक लागला आहे.

जागतिक पातळीवर शिक्षणसंस्थांना मानांकन देताना संस्थेच्या शैक्षणिक नावलौकिक किंवा प्रतिष्ठेसाठी ४० टक्के गुण होते. तर भारतीय पातळीवर याच बाबीसाठी ३० टक्के गुण होते. भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांचे मूल्यमापन करताना शैक्षणिक लौकिकासाठी ३० टक्के, नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांच्या लेखी असणाऱ्या लौकिकासाठी २० टक्के, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तरासाठी २० टक्के, एकूण कर्मचाऱ्यांमध्ये पीएचडीधारक कर्मचाऱ्यांच्या प्रमाणासाठी १० टक्के, स्कोपस डेटाबेसनुसार दर प्राध्यापक शोधनिबंधांसाठी १० टक्के, स्कोपस डेटाबेसनुसार प्रत्येक शोधनिबंधाच्या झालेल्या उल्लेखांसाठी ५ टक्के, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रमाणासाठी प्रत्येकी २.५ टक्के अशी गुण विभागणी केली होती.

क्वाक्वारेली सायमंड्स(क्यूएस) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील तसेच विविध खंडांतील विद्यपीठांचे मूल्यांकन जाहीर करते. जगभरातील विद्यपीठांमध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता अशा अनेक बाबी तपासून त्यानंतर हे मूल्यांकन जाहीर करण्यात येते  कंपनीने यापूर्वी चीनच्या शिक्षणसंस्थांचे मूल्यांकन केले. त्यानंतर भारताचे मूल्यांकन केले. हे दोन्ही देश विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार महत्त्वाचे असल्याचे कंपनीने सांगितले. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरियातील शिक्षणसंस्थांचे मूल्यांकन केले जाणार आहे.