मुंबई : मुंबईत पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाचा सोहळा शुक्रवारी सुरक्षितपणे पार पडला.

शहरभरात १६ हजार ४९२ गणपतींचे विसर्जन केले गेले. सार्वजनिक मंडळांचे १६१ आणि घरगुती १६ हजार ३३१ गणपती विसर्जित केले गेले. यापैकी ३ हजार ७७० गणपतींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. यात ४६ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचा आणि ८४९ घरगुती गणेशमूर्तीचा समावेश होता, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

मालवाहू वाहनांवर निर्बंध

विविध विकास प्रकल्पांमुळे शहराच्या बहुतांश भागातील प्रमुख मार्ग अरुंद बनल्याने गणेश विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांनी वाणिज्य-मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार शनिवारी दुपारी २ ते मध्यरात्री २ आणि १२ सप्टेंबर दुपारी २ ते १३ सप्टेंबर पहाटे ६ या वेळेत शहराबाहेरून येणाऱ्या, शहरातून बाहेर पडणाऱ्या अवजड, मध्यम व हलक्या (तीन चाकी टेम्पोसह) मालवाहू वाहनांना बंदी असेल. या र्निबधांतून प्रवासी  बस, भाजीपाला, दूध वाहून नेणारी वाहने, पाण्यासह इंधनाचे टँकर, रुग्णवाहिका व शासकीय-निम शासकीय वाहनांना सूट असेल. गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी निर्बंध शिथिल असतील.