निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि विजेचे खांब कोसळले तर काही ठिकाणी रोहित्रांचेही नुकसान झाले आहे. हे चक्रीवादळ रायगडमध्ये धडकणार असल्याने जिल्ह्य़ातील ८ तालुक्यांतील २ लाख ६८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.

महावितरणने उरण जीटीपीएस-२२० कि.व्हो. या उपकेंद्रासह कांडलगाव, पाबरा व थल या प्रत्येकी १०० कि.व्हो. उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या उरण, अलिबाग, मुरूड, तळा, मानगाव, मसाळा, श्रीवर्धन व गोरेगाव या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या २२ कि.व्हो. उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. यामुळे आठ तालुक्यातील सुमारे २ लाख ६८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर ६ बाय ६ उंचीचे ३ खांब तुटून कोसळले.

गोरेगाव उपविभागअंतर्गत येणाऱ्या कांदलगाव उपकेंद्राच्या उच्चदाब वाहिन्या जोरदार वाऱ्यामुळे बंद करण्यात आल्या होत्या. चक्रीवादळामुळे अंबरले येथील एक रोहीत्र आणि ३ उच्चदाब खांब कोसळून पडले. वडाचा कोंड येथे एका रोहित्राचा खांब वाकला. लोणेरे येथील एक लघुदाब खांब कोसळून पडला. वाशी येथील २२ के. व्ही फीडर ट्रिप झाला होता.

वाशी येथील सेक्टर १७ मध्ये लोंढे मामा खानावळजवळील लघुदाब वाहिनीवर झाड पडले होते. नावाडा येथे देखील एक उच्चदाब खांब कोसळून पडला. करंजाडे, बौद्धवाडा रस्त्यालगतचे तसेच घोटगाव येथील खांबावर झाड पडल्याने विजेचे खांब कोसळून पडले. तुर्भे एम.आय.डी. सी. येथील २२/२२ के व्ही. सबस्टेशनची कंपाउंड भिंतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईतही हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

कल्याण पश्चिममधील बारावे, रामबाग, शिवाजी चौक, रहेजा, कल्याण पूर्वमधील वालधुनी, ठाकुर्ली, काटे मानिवली, चिंचपाडा, डोंबिवलीतील कोपर रोड, नांदीवली, आजदे, नवपाडा भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. कल्याण मंडल दोन अंतर्गत येणाऱ्या बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ याठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

पुणे जिल्ह्य़ात वीजयंत्रणेवर मोठी झाडे आणि फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५४० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील ३४० वीजवाहिन्यांचा पुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला.