मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

मुंबई :  संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात रुजलेली सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य होणार नाही, असा सूचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळा समिती आयोजित आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र विधानभवन यांच्या सहकार्याने सहकारतपस्वी  माजी खासदार दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जनशताब्दीच्या प्रेरणोत्सव या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

एकविसाव्या शतकातील सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेणे, या क्षेत्रातील उणिवा आणि दोष दूर करण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषदेच्या आयोजनातून विचारमंथन घडवून आणावे, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जन्मशताब्दी सोहळा समितीचे कार्याध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.