मुंबईत पाणी तुंबण्यासाठी एक-दोन तासाचा पाऊसही पुरेसा आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होण्याआधी मुंबई महापालिकेकडून यंदा पाणी साचणार नाही, आम्ही पंपिंग स्टेशन्स उभारले आहेत असे मोठ मोठे दावे केले जातात. पण प्रत्यक्षात जेव्हा मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा हे सर्व दावे वाहून गेलेले असतात. वर्षानुवर्षे ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतेय तिथे पाणी तुंबणे थांबवता येत नसेल तर निदान नवीन भागात पाणी साचणार नाही याची काळजी पालिकेने घेतली पाहिजे.

यावर्षी मुंबईत पाणी साचण्याच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पाण्याची निचरा करण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका दरवर्षी कोटयावधी रुपये खर्च करते. पण हे सर्व पैसे पाण्यात जात आहेत. मुंबईत पाणी साचण्याच्या ज्या जागा वाढल्या आहेत त्यासाठी महापालिकेने मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला जबाबदार धरले आहे. २०१४ मध्ये मुंबईत पाणी साचण्याच्या ४० जागा होत्या. पण आता हाच आकडा वाढून २२५ झाला आहे.

२०१४-१५ सालच्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील माहितीनुसार मुंबईत ४० ठिकाणी पाणी भरायचे. २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये  हा आकडा तितकाच होता. पण २०१७-१८ साली मुंबईत पाणी भरण्याच्या जागा वाढून ६६ झाल्या. त्यावर्षी अर्थसंकल्पात पाणी साचू नये यासाठी ७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

मागच्यावर्षी २९ ऑगस्ट २०१७ साली मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यानंतर मुंबईत १४६ ठिकाणी पाणी भरल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. मुंबईचे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ही माहिती दिली. त्यानंतर यावर्षी मान्सूनच्या पावसाआधी महापालिकेने मुंबईत पाणी साचण्याच्या जागा २२५ असल्याचे नमूद केले. म्हणजे मागच्यावर्षीच्या तुलनेत ७९ जागांची वाढ झाली आहे.