समुद्रात बुडणाऱ्या जहाजावरील आठ जणांना वाचविण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश आले आहे.  शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून बचावलेले सर्व खलाशी गुजरातमधील असल्याचे समजते.
एसएसव्ही सरोजिनी हे जहाज शुक्रवारी संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरमधून केरळच्या बेयपोर इथे ४३० टन सोड्याची पावडर घेऊन जात होते. त्यावर गुजरातचे आठ खलाशी होते. मात्र, हे जहाज मुरुडपासून १२ नॉटिकल मैल आणि मुंबईपासून अंदाजे ५० किमी अंतरावर आले असता त्या जहाजाच्या एका भागातून इंजिन रूममध्ये पाणी घुसण्यास सुरूवात झाली. ही बाब खलाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ही माहिती गस्तीवर असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना दिली. तटरक्षक दलाच्या जवानांनी तात्काळ बचाव मोहीम सुरु केली. तसेच सागरी बचाव समन्वय केंद्र, मुंबई व तटरक्षक प्रादेशिक मुख्यालयाला कळवले आणि ते घटनास्थळी पोहचले. संध्याकाळी ७ च्या सुमारास सुरू झालेली ही बचाव मोहिम रात्री १० वाजता यशस्वी रित्या संपली. सव्वा तीन तासांनंतर तटरक्षक दलाच्या जवानांनी आठ खलाशांची सुटका करून त्यांना मुंबईत आणले.