प्रवाशांना थेट मोबाइलवरच रेल्वेचे तिकीट काढता यावे, यासाठी बनविण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे शनिवारी मुंबईत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री आणि शिवसेना आमदार सुभाष देसाईदेखील उपस्थित होते. या सुविधेमुळे रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत ताटकळत राहण्यापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वेवरील १० महत्त्वाच्या स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या कारभारात अनेक महत्वपूर्ण सुधारणा आणणार असल्याची घोषणा केली. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी यापुढे रेल्वेसाठी उत्तम स्वयंपाकघराची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या खाद्यपदार्थांची ऑर्डर प्रवाशांना मोबाईलद्वारे देता येण्यासाठी व्यवस्था करणार असल्याचेही माहिती त्यांनी यावेळी दिली.

पैसे कसे?
तिकिटांचे पैसे भरण्यासाठी रेल्वेने ‘आर वॉलेट’ ही संकल्पना आणली आहे. या ‘वॉलेट’मध्ये पैसे भरण्यासाठी ‘ऑनलाइन’, ‘तिकीट खिडकीवर पैसे देऊन’ असे पर्याय उपलब्ध आहेत. मोबाइलवर तिकीट काढल्यानंतर तिकिटांची रक्कम वजा होऊन ‘वॉलेट’मध्ये उरलेली रक्कम पाहता येईल.
* या अ‍ॅपद्वारे तिकीट काढून रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम यंत्रांद्वारे ते छापून घेता येईल.
* त्यासाठी त्या अ‍ॅपवर तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवावा लागेल.
* तिकीट काढल्यानंतर मोबाइलवर एक संदेश येईल. या संदेशात एक, चार किंवा सहा अंकी पिन पाठवण्यात येईल.
* एटीव्हीएम यंत्रात स्मार्टकार्डच्या बरोबरीनेच मोबाइलचाही पर्याय दिला जाईल. त्या पर्यायावर गेल्यानंतर मोबाइल क्रमांक आणि संदेशाद्वारे आलेला पिन क्रमांक टाकून छापील तिकीट घेता येणार आहे.