दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात होती. त्यानुसार रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत हजाराच्या आत रुग्णसंख्या असताना शुक्रवारी १०३१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला.

दिवाळीनंतर पालिकेने मुंबईतील चाचण्यांची संख्याही वाढवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी १७,३०० चाचण्या करण्यात आल्या. त्यातून १०३१ रुग्ण बाधित आढळले आहेत तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा १०,६३७ वर गेला आहे. ५५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या ९०४६ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी आता २९६ दिवसांवर घसरला आहे.

ठाणे जिल्ह्य़ांत १४ जणांचा मृत्यू

ठाणे जिह्य़ात शुक्रवारी ६७० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख २२ हजार २०२ इतकी झालेली आहे. तर दिवसभरात १४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ५८२ इतका झाला आहे.

नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १८०, कल्याण-डोंबिवली १४४, नवी मुंबई १६८, उल्हासनगर १४, भिवंडी १९, मीरा-भाईंदर ७१, अंबरनाथ २४ आणि बदलापूरमधील १७ रुग्णांचा सामावेश आहे. तसेच ठाणे ग्रामीण भागात ३३ नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, तर ठाण्यात ४, कल्याण डोंबिवली ४, नवी मुंबई ३, उल्हासनगर १ आणि ग्रामीण भागातील दोघांचा मृत्यू झाला.

राज्यात ५,६४० नवे रुग्ण

राज्यात ५६४० नवे रुग्ण आढळले असून, १५५ जणांचा मृत्यू झाला. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकू ण संख्या १७ लाख ६८ हजार झाली असून, ४६,५११ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर हा २.६३ टक्के आहे. गेल्या २४ तासात ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात नाशिक जिल्हा ३७७, पुणे शहर ३३५, पिंपरी-चिंचवड १६५, उर्वरित पुणे जिल्हा २४८, नागपूर शहर ३७९ नवे रुग्ण आढळले.

देशभरात बाधितांची संख्या ९० लाखांपलीकडे

गेल्या २४ तासांत आणखी ४५,८८२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे, देशातील बाधितांची संख्या शुक्रवारी ९० लाखावर पोहोचली. याच वेळी, ८४.२८ लाख लोक बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण ९३.६ टक्क्य़ांवर गेले आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या शुक्रवारी ९०,०४,३६५ इतकी झाली. २४ तासांमध्ये ५८४ लोक करोनाला बळी पडल्यामुळे आतापर्यंतची करोनामृत्यूंची संख्या १,३२,१६२ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. मृत्यूदर १.४६ टक्क्य़ांपर्यंत घसरला आहे. देशात सध्या करोना संसर्गाची ४,४३,७९४ सक्रिय प्रकरणे असून, हे प्रमाण एकूण संख्येच्या ४.९२ टक्के इतके आहे.