राज्यात इतरत्र तापमान चाळिशी गाठत असताना मुंबईसह कोकणातील तापमान काहीसे आल्हाददायक होते. पण आता या परिसरातील कमाल तापमानातही तीन ते चार अंश से.ची वाढ होण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे राज्याच्या इतर भागात खाली आलेल्या पाऱ्याचाही पुन्हा ऊध्र्व दिशेने प्रवास सुरू होईल. या वर्षी एप्रिल ते जूनमध्ये उन्हाच्या लाटांचा प्रभाव वाढण्याची शक्यता केंद्रीय वेधशाळेच्या अहवालात वर्तवण्यात आली. एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात त्याचा प्रत्यय आला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक ठिकाणी तापमान ४४ अंश से.पर्यंत पोहोचले. त्या वेळी कोकण परिसरातील कमाल तापमान मात्र ३२ अंश से.पर्यंतच मर्यादित राहिले. गुरुवारपासून मात्र तापमानात वाढ होत असून मुंबईत सांताक्रूझ येथे ३४.२ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली. यापुढे तापमानात फारशी घट होणार नाही. पुढील दोन दिवस तापमान ३५ अंश से.पर्यंत जाईल, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात इतरत्र अवकाळी पावसामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून दोन दिवस तापमानात घसरण झाली. अवकाळी पावसाचा जोर आता ओसरल्याने पुन्हा उष्णतेच्या लाटेचे चक्र सुरू होण्याचा अंदाज आहे. विदर्भात बुधवारीच तापमान वाढण्यास सुरुवात झाली. राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंश से.ने वाढणार असल्याचे केंद्रीय वेधशाळेने म्हटले आहे. त्याचा परिणाम राज्यावरही होण्याची शक्यता आहे. वातावरण कक्ष स्थापणार - रामदास कदम मुंबई : सततच्या बदलणाऱ्या हवामानाच्या पाश्र्वभूमीवर वातावरणातील बदलाचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. तसेच येत्या काळात राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावून ते जगविण्यासाठी राज्य सरकार विशेष मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.