भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन हा भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत दु:खाचा क्षण आहे. भारताने आज आपला सर्वात यशस्वी कर्णधार गमावला आहे अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी अजित वाडेकरांबद्दल आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मागच्या काही काळापासून अजित वाडेकर आजारी होते. त्यांच्याच कर्णधारपदाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

१९५८ साली मुंबईच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारे वाडेकर एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. स्लीपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती.