लवकरच पनवेल ते वसई मार्गावर लोकल ट्रेन धावण्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून (एमआरव्हीसी) याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या महिन्यात मुंबईमधील सह्याद्री गेस्ट हाऊसवर पार पडलेल्या आढावा बैठकीत यासंबंधी चर्चा केली. सध्या पनवेल ते वसई मार्गावर मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ट्रेन्स धावत असून, बाहेर गावावरुन येणाऱ्या काही ट्रेनही या स्थानकांवर थांबतात. निमशहरी आणि ग्रामीण भागांसाठी भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी मेमू ट्रेन सेवा पुरवली जाते. विरार-डहाणू रोड मार्गावरही मेमूद्वारे ही सेवा पुरवली जाते. या प्रस्तावित मार्गावर लोकल सेवा सुरु करण्यासाठी एमआरव्हीसी सध्या सर्व पडताळणी तपासून पाहत असून सुकरता तपासली जात आहे. या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वेला त्यांच्या सध्याच्या प्रणालीत अनेक बदल करावे लागतील. "पनवेल ते वसईदरम्यान लोकल सेवा सुरु कऱण्यासाठी सिग्नल यंत्रणेत बदल करावे लागतील. तसंच मेमू ट्रेन्समुळे फलाटांमध्ये खूप मोठं अंतर असून ते भरुन काढावं लागेल. पियूष गोयल यांनी जे बदल करावे लागतील त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यास तसंच लोकल सेवा सुरु करणं कितपत शक्य आहे यासंबंधी शक्यता पडताळून पाहण्यास सांगितलं आहे," अशी माहिती एका वरिष्ठ एमआरव्हीसी अधिकाऱ्याने दिली आहे. पनवेल ते वसईदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन उभी करण्याची एमआरव्हीसीची योजना आहे. याआधी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3A कडे याची जबाबदारी होती, तसंच या मार्गावर लोकल धावण्याची योजना होती. पण या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही आणि समीक्षा करण्यासाठी पुन्हा रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. पण महत्त्वाचं म्हणजे पनवेल-वसई आणि दिवा मार्गावर लोकल मार्ग बांधण्याची चर्चा २०१२ पासून सुरु आहे.