राज्य ६० व्या वर्षांत पदार्पण करतंय आणि मी ८० व्या वर्षांत पदार्पण करतोय. आता या वयात आपण थांबायचं, आता कसलं व्हिजन बघत बसायचं. व्हिजन बघण्यासंबधीचं काम नव्या पिढीकडे द्यायचं आणि आपण बघत राहायचं त्यांच्याकडे. अलीकडे मी तेच काम करतोय, सुपुर्द केलं आहे काम आणि त्याच्याकडे मी बघत बसतो, काही अडचण आली, विचारलं तर सांगायचं. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यातून राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिल्याचे दिसत आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यानही त्यांनी सक्रीय निवडणुका आता लढणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या व नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं व ते काय करतात हे पाहायचं, ते करत असलेल्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझाच्या “माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन” कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहत असतो, त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं व सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं योग्य नसतं, त्यामुळं तुमचा मान राहत नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचं सांगत पवार म्हणाले, काँग्रेसमध्ये निर्णय घेण्यासाठी दिल्लीत जावं लागतं. शिवसेनेचे निर्णय मुंबईतच होतात. आज काँग्रेसने निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. सहकार्य करायचे आणि सरकार टिकवायचे ही भूमिका काँग्रेसमध्ये दिसते. शिवसेना म्हणून आमचा शिवसेनेशी कधी संपर्क आला नाही. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे मित्र होते. त्यांच्याशी खूप संपर्क होता, एखादा शब्द दिला तर तो पूर्ण करायचे, असं देखील पवारांनी यावेळी बोलून दाखवलं.

सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. मला स्वतःला या सरकारबद्दल कुठलीही शंका नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते सर्वांना सोबत घेऊन चालणार आहेत, दुसऱ्यांच्या कामात ते अजिबात हस्तक्षेप करत नाहीत, असं ते म्हणाले.