हताश नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, काहीही करा पण मला लवकर मंत्री करा, असे साकडेच  मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुहूर्त लांबत चालल्याने हताश झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले.

गेल्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिलेल्या राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण भाजपकडून राणे यांची पदोपदी अडवणूक करण्यात आली आहे. भाजपमध्ये राणे यांना अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला नाही. स्वतंत्र पक्ष स्थापन करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत राणे यांना उमेदवारी किंवा पाठिंबा देण्याचे भाजपने टाळले. शिवसेना नाराज होईल म्हणून राणे यांचा पत्ता कापण्यात आला. पुन्हा आमदारकी मिळविण्यासाठीही राणे यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

मंत्रिमंडळात समावेश करण्याचे राणे यांना आश्वासन देण्यात आले असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात येत आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत राणे यांची नाराजी उफाळून आली. २०१८ सुरू झाले, मग तुमचा मंत्रिमंडळातील समावेश कधी, या प्रश्नावर राणे यांनी माझी सहनशीलता संपण्यापूर्वी निर्णय घ्यावा, असे उद्गार काढले.

शिवसेना, काँग्रेस आता रालोआ

उद्धव ठाकरे यांचे प्रस्थ वाढल्याने नाराज झालेल्या राणे यांनी शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारले. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी विचार न झाल्याने राणे संतप्त झाले. त्यांनी थेट पक्ष नेतृत्वावर तोफ डागली. काँग्रेसने राणे यांच्या मनाप्रमाणे न घेतल्याने शेवटी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. रालोआमध्ये राणे टोकाची भूमिका घेणार नाहीत, असे वाटत होते. पण तसे घडलेच नाही.