राज्यातील डझनभर रक्तपेढय़ांचे परवाने अन्न व औषध प्रशासनाकडून निलंबित

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना आणि अपघातग्रस्तांच्या शस्त्रक्रियांकरीता सर्वात मोलाची भूमिका रक्तपेढय़ा बजावतात. रुग्णाला तातडीने आवश्यक तितके सुरक्षित रक्त पुरविण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. मात्र या जबाबदारीपासून लांब पळणाऱ्या रक्तपेढय़ांवर कारवाई सुरू झाली आहे. कायद्यानुसार नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या आणि रुग्णांना वेठीस धरणाऱ्या रक्तपेढय़ांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोहिम उघडली असून एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत प्रशासनाने राज्यभरातील १२ रक्तपेढय़ांचे परवाने निलंबित केले, तर एका रक्तपेढीचा परवाना रद्द केला आहे.

गेल्या वर्षी प्रशासनाने राज्यभरातील एकूण ४२ रक्तपेढय़ांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. चोवीस तास सुरू असणाऱ्या  रक्तपेढय़ांमध्ये तीन रक्त संक्रमण अधिकारी (तीन शिफ्टमध्ये) बंधनकारक असतानाही अनेक रक्तपेढय़ांमध्ये रक्त संक्रमण अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे. गंभीर चुका टाळण्यासाठी रक्तपेढय़ांमध्ये अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असते. रक्तपेढय़ातील तंत्रज्ञांकडून तपासणीसाठी रुग्णांचे रक्त घेताना, रक्तातील प्लाझमा, प्लेटलेट्स यांसारखे घटक वेगळे करताना चुका होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असते. तसेच वापरण्यात येणारी उपकरणेही स्वच्छ असणे, पूरेशी जागा असणे औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा, १९४० नुसार बंधनकारक आहे.

२०१६ मध्ये अन्न व औषध प्रशासनाने कायद्यातील तरतूदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४२ रक्त पेढय़ांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याचे आश्वासन रक्तपेढय़ांमार्फत देण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात रक्तपेढय़ांकडे पूरेशा कर्मचाऱ्यांची संख्या नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याबरोबरच एचआयव्हीसाठी आवश्यक असणारी एलायझा तपासणी या रक्तपेढय़ांकडे उपलब्ध नव्हती. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि अन्न व औषध प्रशासन यांना एकत्रितपणे मुंबईतील ५९ रक्तपेढय़ांची भेट घेतली. यामध्ये रक्त संक्रमण अधिकाऱ्यांचा अभाव, तपासणी साहित्य उपलब्ध नसणे यांसारख्या अनेक त्रुटी आढळल्या.

परवाना निलंबित केलेल्या रक्तपेढय़ा

  • अथर रक्तपेढी, सोलापूर
  • केईएम रक्तपेढी, पुणे</li>
  • सिद्धेश्वर रक्तपेढी, सोलापूर
  • अर्पण रक्तपेढी, कोल्हापूर</li>
  • शाहू रक्तपेढी, सोलापूर
  • मलिकार्जन रक्तपेढी, सोलापूर
  • अक्षय रक्तपेढी, सोलापूर
  • औंध रक्तपेढी, पुणे
  • आयएसआय रक्तपेढी, पुणे
  • के.एन.गुजर रक्तपेढी, सातारा
  • नवी मुंबई रक्तपेढी, खारघर
  • कॉन्टिनेंटल मेडिकेअर फांऊडेशन रक्तपेढी, नेरूळ

झाले काय?

रक्तपेढय़ांचा परवाना पाच वर्षांसाठी वैध असतो. अन्न व औषध प्रशासनाने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्यानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था परवान्याचे नूतनीकरण करते. हयगयप्रकरणी सोलापूरातील पाच, पुण्यातील तीन, कोल्हापूरातील एक, साताऱ्यातील एक, नवी मुंबईतील दोन रक्तपेढय़ांचे परवाना निलंबित करण्यात आले असून रायगड येथील एम.बी.मोरे फांऊडेशन स्वर्गीय डी.जी. तटकरे रक्तपेढीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.