भारतासारख्या विकसनशील देशात सामाजिक समस्यांचा तुटवडा नाही. एखादा सामाजिक कार्यकर्ता काम करतो तेव्हा त्याला एको समस्येपुरते मर्यादित न राहाता ग्रामीण विकासाचा सर्वांगाने विचार करावा लागतो. त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते. अशा सामाजिक कामांना समाजासमोर आणत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ‘जमनालाल बजाज फाऊंडेशन’ करत आहे. यासाठी सोमवारी ४२ व्या ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन गिरगाव येथील ‘द रॉयल ऑपेरा हाऊस’ येथे करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ईशा फाऊंडेशनच्या सद्गुरु यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी १० लाख रुपये देऊन सन्मानित क रण्यात आले. भवानी शंकर कुसुम यांना रचनात्मक कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. त्यांनी राजस्थानातील ग्रामीण भागात कुष्ठरोग रुग्ण, अपंग, अनुसूचित जाती-जमातींतील महिला व इतर गोरगरिबांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवला आहे. ग्रामीण विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठीचा पुरस्कार राजस्थानच्या मोहम्मद इमरान खान मेवाटी यांना प्रदान करण्यात आला. ते सरकारी शाळेत गणित विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी आतापर्यंत ८० शैक्षणिक अॅप विकसित केले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांचे पुस्तकाबाहेरील ज्ञान प्राप्त करता येते. हे अॅप मोफत आणि वापरकर्तास्नेही आहेत. महिला आणि बालकल्याण विभागासाठी जानकीदेवी बजाज यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्रातल्या सुश्री शाहिन मिस्त्री यांना देण्यात आला. आर्थिकदृष्टय़ा वंचित गटातील मुलांचा क्षमताविकास शिक्षणाद्वारे घडवून आणण्याचे कार्य सुश्री यांनी आकांक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून केले. १५ मुलांपासून त्यांनी सुरुवात केली होती. गेल्या ३० वर्षांत त्या ३८ हजार मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. ‘टेक फॉर इंडिया’ या संस्थेची स्थापन करून सुश्री यांनी शैक्षणिक असमानता नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारताबाहेर गांधीवादी विचारांचा प्रसार करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मेक्सिकोच्या सोनिया डेटो यांना देण्यात आला. त्यांनी गुजरात विद्यापीठातून अहिंसा आणि कला यांतील संबंधांच्या परिणामकारकतेचा अभ्यास केला.