अभिनेत्री कंगनाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात आता अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. कंगनाने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काही वक्तव्यं केली होती. त्या वक्तव्यावरुन जावेद अख्तर यांनी तिच्या विरोधात मानहानीचा दावा केला आहे. जावेद अख्तर यांनी मला घरी बोलावलं आणि धमकी देऊन हृतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागण्यास सांगितलं असं कंगनाने म्हटलं होतं. तसंच कंगनाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात माझे नाव काहीही कारण नसताना घेतले असंही जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

जावेद अख्तर यांनी मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे यासंदर्भातली तक्रार केली आहे. ८ महिन्यांपूर्वी कंगनाची बहीण रंगोलीने दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाला हृतिक रोशनची माफी मागण्यासंदर्भात धमकावलं आहे असं ट्विट केलं होतं. जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावलं आणि धमकावलं असंही तिने म्हटलं होतं. यासंदर्भातला उल्लेखही जावेद अख्तर यांच्या तक्रारीत आहे.

दरम्यान आजच अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना १० नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे समाजात दुहीचं वातावरण निर्माण झाला असा आरोप या दोघींवर आहे. या प्रकरणी या दोघींनाही उत्तर द्यायचं आहे. त्यासाठीच हे समन्स बजावण्यात आलं आहे.