मुंबईहून जयपूरला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानातील कर्मचारी हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास विसरला, परिणामी शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. स्वीच सुरू न झाल्याने विमानातील हवेचा दाब वाढला, त्यामुळे 30 ते 35 प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्त वाहू लागलं आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आलं आहे.


डीजीसीएने या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय विमानातील केबिन क्रूचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानाने आज पहाटे मुबई विमानतळाहून उड्डाण घेतलं होतं. या विमानात 166 प्रवासी होते. पण उड्डाण घेतेवेळी विमानातील केबिन क्रू हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास विसरला. त्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानातील हवेचा दाब वाढला आणि प्रवाशांना अचानक त्रास व्हायला सुरूवात झाली व विमानात एकच खळबळ उडाली. त्यामुळे हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं. त्यानंतर प्रवाशांना विमानतळावरील दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.