मुंबई : पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास यावरच गेली ३४ वर्षे ‘केसरी’ची यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशा शब्दांत ‘केसरी’ टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांनी पर्यटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. केसरी पाटील यांनी त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या समारंभात उपस्थितांशी संवाद साधला. ‘पर्यटक देवो भव:’ या संकल्पनेतूनच केसरीची स्थापना झाली आणि आता विस्तारही सुरू आहे. केसरीने नेहमीच पर्यटकांना उत्तमोत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. राजस्थान सहलीपासून सुरू झालेले हे पर्यटन आज सप्तखंडात पोहोचले आहे. पर्यटन क्षेत्र सेवाभिमुख असल्याने व्यावसायिक सेवेला महत्त्व आले आहे. पर्यटन विश्वात आपले स्थान निर्माण करण्यासोबत जगाची माहितीही पर्यटकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. त्यातूनच केसरी नवनवीन प्रयोग या क्षेत्रात राबवत आहे. म्हणूनच विविध सन्मान केसरीला मिळाले आहेत, असेही केसरी पाटील यांनी सांगितले.