‘राजीव गांधी खेलरत्न’ हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या मराठमोळ्या व्यक्तींमध्ये सचिन तेंडुलकरनंतर नेमबाज अंजली भागवत यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची सुवर्णकन्या अंजली यांच्या कारकीर्दीचा वेध येत्या शुक्रवारी, २४ जुलैला सायंकाळी ५ वाजता लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमातून घेतला जाणार आहे. नव्वदच्या दशकात भारतात क्रिकेट सोडून अन्य खेळांकडे क्रीडाप्रेमींचा ओढा कमी होता. मात्र त्या काळात अंजली यांनी नेमबाजीसारख्या कठीण खेळात सोनेरी यश मिळवून दाखवले. बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण, बिलियर्ड्सपटू गीत सेठी, बुद्धिबळात विश्वनाथन आनंद यांच्याप्रमाणेच क्रिकेटेतर खेळात कौटुंबिक पाठबळ आणि स्वयंस्फू र्तीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यानंतर अंजली यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक युवक-युवती या खेळात कारकीर्द करण्यासाठी पुढे आल्या आहेत. ‘खेलरत्न’ हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने २००३मध्ये अंजली यांचा गौरव करण्यात आला होता. २०००मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर १९९२मध्ये राज्यातील शिवछत्रपती पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला होता. आंतरराष्ट्रीय नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतरही एक प्रशिक्षक म्हणून अंजली या विशेष प्रभाव पाडत आहे. पुण्यात स्थायिक झालेल्या अंजली यांनी त्यांच्या घरामध्येच १० मीटर रेंज तयार केली आहे. देदीप्यमान कारकीर्द * २००२च्या मॅँचेस्टर येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके * २००२मध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान * मिलान येथे २००३मध्ये जगज्जेतेपद * आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाकडून ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ने गौरव * राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत ९ सुवर्णपदकांची कमाई. सहभागासाठी : येथे नोंदणी आवश्यक.