रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. तर, पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला गेले आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ”अर्णब गोस्वामी यांना ज्या प्रकारे अटक करण्यात आली आहे, ठाकरे सरकारला त्याची किंमत मोजवी लागेल.” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

”अर्णब गोस्वामींच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. जेव्हापासून ठाकरे सरकार सत्तेत आले आहे. पत्रकारांना सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्ट यांना पोलीस बळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या नौदल अधिकाऱ्याच्या घरात जाऊन त्यास मारहाण करणं, एखाद्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्टचं मुंडन करणं व पत्रकारांना तुरूंगात टाकणं, ठाकरे सरकारला याचे उत्तर द्यावं लागेल.” असं सोमय्या यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

तसेच, मी अर्णब गोस्वामींना भेटायला अलिबाग पोलीस स्टेशनला जाण्यासाठी मुंबईहून निघालो, असल्याचीही त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यापासून गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी भाजपा नेत्यांसह भाजपा प्रवक्त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याशिवाय, भाजपा कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतर आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी आंदोलनही केली जात आहेत.

आणखी वाचा- “कम्बख़्त उसूलों पे चला होगा”; अमृता फडणवीसांकडून अर्णब गोस्वामींची पाठराखण

अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

रिपब्लिकचा काय दावा-
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.