गणेशोत्सवासाठी रेल्वेने कोकणात निघालेल्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत. तुतारी एक्सप्रेस रद्द करण्याच्या घोषणेमुळे गुरुवारी दुपारी प्रवाशांचा दादर रेल्वे स्थानकात उद्रेक झाला. प्रवासी थेट निषेध नोंदवण्यासाठी रेल्वे रुळावर उतरले होते. पण रेल्वे पोलिसांनी त्यांची समजूत घातली. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि मागणीमुळे रेल्वेने आता ही गाडी उशिराने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबईसह ठाण्यातून लाखो संख्येने चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी कोकणात जातात. गणेशोत्सवाच्या काळात काही जादा रेल्वे गाडयाही सोडल्या जातात. गणेशोत्सव सुरु होऊन तीन दिवस उलटले असले तरी अजूनही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही.