मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : दोन वर्षांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत रखडली असली तरी आता शहराजवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी मुंबई-ठाणेकरांना मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. २०१८ मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत निघाली होती. त्यानंतर सर्वसामान्य नागरिक सोडतीच्या प्रतीक्षेतच होते. आता ही प्रतीक्षा संपणार असून कोकण मंडळातील सुमारे नऊ हजार हजार घरांसाठी दसऱ्यादरम्यान सोडत काढण्यात येणार आहे. लवकरच या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेतील ६५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, असेही त्यांनी सांगितले.

कोकण मंडळाच्या सोडतीची घोषणा याआधीही काही महिन्यांपूर्वी झाली होती. मात्र, काही तांत्रिक आणि इतर कारणांमुळे ही सोडत रखडली होती. मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोडतीत ३०० ते ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा समावेश असेल. या घरांच्या किमती १२ ते ५६ लाख रुपयांदरम्यान असतील.

कुठे- किती घरे?

*मिरारोड येथे मध्यम उत्पन्न गटासाठी १९६ घरे असून १ बीएचके आणि २ बीएचके अशी ही घरे आहेत.

*वर्तक नगर, ठाणे येथील अल्प गटातील ६७ घरे सोडतीत असून, ही घरे ३२० चौ. फुटांची आहेत. या घरांच्या किमती ३८ ते ४० लाखांदरम्यान असतील.

*विरार-बोळींजमधील १३०० घरे आहेत. त्यातील सुमारे एक हजार घरे अल्प तर उर्वरित घरे मध्यम गटातील आहेत.

*कल्याणमध्ये २००० घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून, त्याची किंमत १६ लाख रुपये असेल.

*गोठेघर, ठाणे – १२०० घरे (३०० चौ. फूट) अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून, किंमत १७ लाख आहे.

*वडवली येथे २० घरे, कासारवडवलीत ३५० घरे अल्प गटासाठी असून, किंमत १६ लाख असेल.