राज्यात पावसाने दोन दिवसांपूर्वी घातलेल्या थैमानातून कोकण रेल्वे मार्ग तूर्त तरी सुटला असून ही रेल्वे सुरळीत आणि सुरक्षित धावत आहे. या मार्गावर दरडी कोसळण्याची भीती अधिक असल्याने कोकण रेल्वेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आतापर्यंत एकही दरड कोसळण्याची घटना न घडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
यापूर्वी २०१० ला १५ ठिकाणी दरड कोसळल्या होत्या. त्यानंतर हळूहळू हे प्रमाण कमी झाले. त्यामुळे २०११-११ व २०१२-५ ठिकाणी दरड कोसळल्याची नोंद आहे. त्यानंतर कोकण रेल्वेने शॉर्टक्रीटींग (दरडीच्या ठिकाणी सिमेंट क्रॉक्रिटचा लेप देणे) रॉकबोल्टींग ( मोठय़ा खडकांना एकमेकात घट्ट जुळवून ठेवणे) मायक्रो पायलिंग (माती घसणार नाही यासाठी तिची एकसंध बांधणी करणे) गॅबियन पध्दतीची जाळी, दरडीच्या ठिकाणी पायऱ्यांचा उतार, रेल्वे मार्गालगचे पावसाळी नाले रुंदीकरण, दरड कोसळण्याच्या ठिकाणी प्रवाशांना उतरण्यास लागणाऱ्या पायऱ्या, अशा अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे सुरळीत धावत आहे. यात रोहा ते वीर दरम्यान रेल्वेचा ताशी किलोमीटर वेग ९० ठेवण्यात आला आहे. त्यानंतर तो कमी करुन ७५ किमी आहे. एखाद्या ठिकाणी पाऊसाचा जोर वाढल्याचे दिसल्यास मोटरमनला हा वेग ४० किमी पर्यंत कमी करण्याची मुभा देण्यात आली आहे.