करोनाच्या संकटामुळे यंदा शहरांतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ नये या उद्देशाने विलगीकरणासह काही जाचक अटी लादण्याचे संके त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यावर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रि येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेत विलगीकरणाचा कालावधी कमी करून एस. टी. बसेसची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे.

कोकणात जाण्याची परवानगी मिळेल अशांसाठी बसची व्यवस्था करण्याची तयारी राज्य परिवहन विभागाने केली असून केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १४ दिवसांचे विलगीकरण शक्य नसल्याने तो कालावधी कमी करावा, अशी मागणी कोकणातील आमदारांच्या बैठकीत करण्यात आली. कोकणात गणेशोत्सवासाठी जाता येणार की नाही हा कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली.

आम्हाला कोकणातील लोकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यायची आहे. त्यामुळे ती सुरक्षा लक्षात घेऊनच कोकणात जाण्यासाठीची परवानगी व इतर नियम ठरतील. निसर्ग चक्रीवादळामुळे खंडित झालेला अनेक गावांतील वीजपुरवठा आता पूर्ववत झाला आहे. काही ठिकाणी अद्याप काम सुरू आहे. गणेशोत्सवाआधी संपूर्ण कोकणात वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही अनिल परब यांनी दिली. या बैठकीत कोकणातील दोन्ही खासदार, शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे आमदार हजर असताना आपल्याला न बोलावल्याबद्दल भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली.

बैठकीत काय झाले?

मुंबईहून गणेशोत्सवात कोकणात कसे जाता येईल, विलगीकरणाच्या नियमाचे काय करायचे आदी विविध मुद्यांवर चर्चा झाली. मुंबई आणि शहरांतून येणाऱ्या नोकरदार वर्गाला कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. ज्यांना प्रवास करण्याची परवानगी मिळेल त्यांच्यासाठी बसची व्यवस्था होईल. या बैठकीतील चर्चेचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असून ते अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.