निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि बदल्यांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गेल्या काही दिवसांपासून मौन का, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उपस्थित केला. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली. तसेच १०० वेगवेगळ्या मुद्यांसंदर्भात आपण तक्रारी केल्याचेही भाजपाने सांगितलं आहे. मात्र बुधावारी भाजपाच्या मंत्र्यांनी घेतलेल्या याच भेटीवरुन कॉमेडीयन कुणाल कामराने फडणवीसांनावर निशाणा साधला आहे. फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होऊन राज्यपालांना फोन करतात असा टोला कामराने लगावला आहे.

कुणाल कामराने एक ट्विट केलं असून त्यामध्ये फडणवीसांचा उल्लेख केलाय. “जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?”, असं ट्विट कामराने केलं आहे. यामध्ये त्याने स्मायलीजचाही वापर केलाय.

कुणाल कामराने बुधवारी सकाळी केलेल्या या ट्विटला २९०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. यामुळे सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता. पहाटेच्या या शपथविधीवरुन बराच राजकीय गोंधळ निर्माण झालेला. त्याचाच संदर्भ देत कुणाल कामराने फडणवीसांवर आता निशाणा साधलाय.