पावसाळ्यापूर्वीच काम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या आणि अडीच हजार कोटी रूपये खर्चाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे जागतिक कीर्तीचे स्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होणार आहे. या स्मारकाचे काम गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एल अँड टी कंपनीला देण्यात आले. त्यानुसार तीन वर्षांत हे स्मारक पूर्ण होईल. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी एल अँड टी कंपनीचे संचालक एम. व्ही. सतीश व सुशांत शहादेव यांच्याकडे आज या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे पत्र सुपूर्त केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या १५ वर्षांपासून छत्रपती शिवाजी स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. हे सरकार आल्यानंतर आमदार विनायक मेटे यांना स्मारक समितीचे अध्यक्ष करून कामाला गती दिली. राज्य शासनाने अतिशय जलदगतीने काम करत या स्मारकासाठी लागणारे सर्व परवाने आणले आणि आज एल अँड टी या कंपनीला काम सुरू करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आले. कंपनीने पावसाळ्यापूर्वीच स्मारकाचे काम सुरू करावे. तसेच अतिशय वेगाने संपूर्ण स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कमी कालावधीत जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे वैशिष्टय़पूर्ण काम या कंपनीला करण्यास मिळाले आहे. स्मारकाचे काम सुरू करण्यासाठी व सर्व परवाने मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहनत घेतली आहे. स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून भारत अत्युच्च दर्जाचे काम करू शकतो हे जगाला दाखवून द्यवे, असेही फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम करण्यास मिळणे हे आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असून हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे एल अँड टी कंपनीचे संचालक एम.व्ही. सतीश यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या कंत्राटासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी लार्सन अँड टूब्रो कंपनीची निविदा अंतिम पात्र ठरली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि लार्सन अँड टूब्रो कंपनीशी सविस्तर चर्चा करून तसंच कायदेतज्ज्ञांचा सल्ला विचारात घेऊन वाटाघाटीअंती अडीच हजार कोटी रुपये अधिक वस्तू आणि सेवा कर असा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे दिली. हे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून या स्मारकासाठी राजभवनापासून १.२ किलोमीटर आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर तर नरिमन पॉंइंट पासून २.६ किलोमीटर अंतरावर असलेली जागा निश्चित करण्यात आली आहे . या प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरण तसेच सागरी विषयक अभ्यास अहवाल नामांकित संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आला आहे .तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक विविध विभागांचे एकूण १२ ना हरकत दाखले प्राप्त करण्यात आले आहेत .या प्रकल्पाअंतर्गत ६.८ हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा २१० मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.